Friday, October 28, 2016

पाच मिनिटांची उधारी

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात ते पाच मिनिटं खुप महत्त्वाचे असतात. आता हा प्रश्न असेल की कोणती पाच मिनिटे ? तर सकाळी आईनी किंवा बाबानी झोपेतून उठवल्यावर, झोप अपुरी आहे असे वाटण्याची पाच मिनिटे. आपल्याला झोप पूर्ण झाली असे कधी वाटते ? तर आईनी किंवा बाबांनी उठवल्यानंतर पाच मिनिटांनी. आता हे मानसिक फिलींग आहे का ? असेल, पण तुमचा माझा अनुभव सारखाच. कितीही वेळ झोपलो तरी शेवटले पाच मिनिटं झोपण्याची मजा वेगळीच असते. हो की नाही?

आता सकाळी कोणी झोपेतून उठवल्यावर पांघरुणाच्या बाहेर हात काढुन पाच बोटं दाखवुन ब्लिंक करणे किंवा तोंडानी सांगणे ’पाच मिनिटं’ हे किती छान असतं हे माझ्यासारखे झोप प्रेमीच ओळखु शकतात.




आता किन्हीकरांच्या घरात सर्वांनाच झोप अती प्रिय आहे, त्यातलीच एक मी ही. बाबा मला कधीकधी माझ्या काकाआजोबांच्या (बाबाचे काका) कथा सांगतो की कसे ते उशीरापर्यंत झोपुन राहायचे, माझी पणजीआजी येउन त्यांना उठवायचीसुद्धा कारण त्या काळातली घरे छोटी होती आणि सगळे खालीच झोपायचे त्यामुळे घर झाडायला त्रास व्हायचा. तर पणजीआजी उठवायची पण ते काही उठायचे नाही, आणि परत म्हणायचे," माई, ५ मिनिटं फक्त."

हे झोपेचे प्रेम सर्व किन्हीकरांना आहे पण माझा बाबा मात्र त्यात मोडत नाही. बाबाला झोप नावाची गोष्ट अजिबातच आवडत नाही. आता म्हणजे मनुष्यप्राण्याला झोप आवश्यक असते त्यामुळे तो झोपतो खरं, पण त्याला कधी कोणी उठवलयं किंवा तो कधी उशीरापर्यंत झोपला असे मला तरी कधी झालेले आठवत नाही. त्याची झोप म्हणजे अगदीच लिमिटेड. अक्षरश: तो सकाळी २ किंवा ३ वाजता उठुन बसतो. आणि उठल्यावर नेहमीप्रमाणे त्याचं ते facebook लावुन बसतो. पूर्वी हे facebook चं प्रमाण जास्त होतं पण आता तर आमच्या घरात ते नवीन Jio चे कार्ड आणि नवीन Jio Cinema हे app आल्यामुळे तो नवनवीन सिनेमे पाहत असतो. एकदा तर मला राहवलं नाही आणि मी त्याला विचारल,"का बरं तु एवढ्या लवकर उठतोस? तूझी झोप पूर्ण होते का ?" 

तर त्यावर तो म्हणाला,"लहान पणापासुनच मला लवकर उठायची सवय आहे."

मी : "कसं काय?"

बाबा : "पूर्वी सकाळी नळ लवकर यायचे. त्यामुळे पाणी भरायला आम्हाला लवकर उठावं लागायचं. ती सवय तर अजुनही आहे."

माझे डोळे पांढरे झाले. मनात विचार आला ’ कोण एवढ्या सकाळी पाणी भरायला जाणार? नशीब आपण त्या काळात जन्माला नाही आलो ते. आताच सगळं आयतंवायतं सोडुन कोण जाणार फुकटं पाणी भरायला ? उगाच डोक्याला ताप. आपल्याला तर नाही जमणार बाबा असलं काही.’

जर विषय झालाच उशीरापर्यंत झोपायचा तर काही जणं जागे असूनसुद्धा झोपलेल्याच नाटक करतात. उदाहरणार्थ मी. मला जेव्हा सुट्ट्यांमध्ये काय करायचं हा प्रश्न असतो ना तेव्हा मी हा उपाय करते. (आता ते सगळं बंद झालं ही वेगळी गोष्टं). मुद्दाम जागं असुनसुद्धा कंटाळा येत असेल तर उठायचं नाही, आणि मस्त पांघरुणातच डोकं घालुन लोळत राहायचं याची मजा काही निराळीच असते.



कधीकधी काही जणांची तर मजाच येते, काय होतं, की जेव्हा कोणी उठवत असेल आणि तेव्हा समजा सात वाजले असतील, तर आपण सांगतो पाच मिनिटं कारण आपल्याला वाटतं की ०७:०५ जास्तीतजास्त ०७:१० पर्यंत उठुन जाउयात, असे म्हणुन आपण झोपतो. उठुन पाहतो तर काय? घड्याळात वाजलेले असतात आठ वाजुन पाच मिनिटं. आपण पाच मिनिटं म्हणता म्हणता अक्षरश: तासभर झोप घेतो.

तरीही मला वाटतं की कितीही झोप झाली तरी उठवल्यानंतर मागून घेतलेली ही पाच मिनिटे झोप सगळ्यात अमूल्य असते.

-मृण्मयी राम किन्हीकर





2 comments: